Welcome to Mahalaxmi Yatra!

Congratulation to Mr. Jivya Soma Mhase! Padmashree (Warli art)

how to reach mahalaxmi

Dahanu Road Station [Western Rail way Mumbai suburban last station]> Charoti > Mahalaxmi 1. All MSRTC Buses routed to Mahalaxmi yatra 2. Regular 6 seater from Dahanu to Mahalaxmi 3. 6 seater from Dahanu to charoti & charoti to mahalaxmi autorikshaw 4. Individual vehicles [mahalaxmi is on NH 8, 125km from Mumbai towards Ahemadabad

apali prerana

टेक केअर दोस्त


हाय...

पाऊस मुक्कामी आलाय! पण काही म्हणा, आपल्या शहरांतल्या पावसाला गर्दीचा एक तक्रारखोर आवाज असतो. इथे तो भेटतो तेव्हा लेट झालेल्या ट्रेनच्या गर्दीत शिव्या खात असतो किंवा रस्ते तुंबवून गुडघाभर साचलेल्या पाण्यात रिपरिप करत आपल्याला चिडवत राहतो...या पावसाला सरळ टांग मारायची. वीकेण्डला सॅक पाठीवर टाकायची. कॅमेरा लटकवायचा. रेनीवेअर अडकवायचं, कंपूला फोनाफोनी करायची, लोकलच्या वेळा नीट बघायच्या, नाहीतर सरळ गाडी काढायची आणि पावसाला भेटायला रानात जायचं....अस्साच प्लॅन करताय ना? पण मंडळी, या मान्सून पिकनिकपूर्वी लेट मी शेअर वन थिंग.

आमच्याच ऑफिसमधला तो ग्रुप. वेगळ्या सेक्शनमधला. पाऊस सुरू झाल्याबरोबर त्याला सलामी द्यायला सगळ्यांनी कोकणात जायचं ठरलं. रात्रीचा प्रवास करुन सकाळी सगळे तिथं पोहोचले. नदीचं खळाळतं पाणी आणि हिरवाकंच निसर्ग यांनी वेड लावलं सगळ्यांना. कुणाचीही वाट न पाहता तो तर धावलाच पाण्याकडे. कपडे काढून थेट पाण्यात. भय नव्हतंच , कारण तो पट्टीचा पोहणारा. उडी मारली ती थेट तळाशीच. वर्षानुवर्षांचा गाळ पोटात साठवलेल्या नदीने त्यालाही अलगद पोटात घेतलं. हातपाय हलवले असतील खूप. वर यायची धडपडही केली असेल, पण खोल रुतत गेला तो. मित्र धावले. कुणी पॅनिक होऊन उड्या मारल्या नाहीत हे नशीब. गावकऱ्यांना बोलावलं. बराच वेळ शोधाशोध केली. सापडला नाहीच. रात्री शोध थांबवावा लागला. दुसऱ्या दिवशी सापडला, डोळे माशंनी खाल्ले होते...खूप भेसूर दिसत होता म्हणे...आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. चोवीस वर्षांचा.

पाऊस वाढेल, तसतशा बातम्या येत राहतील. आपण वाचू. माहितीचं कुणी असेल तर तात्पुरते हळहळू. पाच मिनिटं अस्वस्थ होऊ आणि सोडून देऊ. आपली पिकनिक प्लॅन करताना हे कुणाच्या ध्यानातही राहणार नाही.

पाण्याचं आदिम आकर्षण असतंच आपल्या सगळ्यांमध्ये. कदाचित आपण पाण्यामधून उत्क्रांत झालो आहोत म्हणून असेल, जन्माला येण्यापूवीर् नऊ महिने पाण्यातच वाढलो म्हणून असेल किंवा शरीरात नव्वद टक्के पाणी घेऊन वावरतो म्हणून असेल. या आकर्षणातूनच पाण्याकडे ओढले जातो आपण. हिरव्या डोंगरावरून फेसाळत कोसळणाऱ्या शुभ्र धबधब्यांखाली भिजणं, चिंब पावसांत समुदाच्या लाटांशी मस्ती करणं, तुडुंब वाहणाऱ्या खळाळत्या गढूळ नदीला आव्हान देणं...हे सगळं उसळत्या तरुणाईला खुणावणारं असतंच, पण बहुतेक वेळा धबधब्यांपर्यंत पोहोचेपर्यंत कडेकपारीतून चालताना सैल झालेली एखादी दरड तुमच्यासह पात्रात कोसळू शकते. खूपदा पाणी दिसतं शांत पण अंदाजापेक्षा ते प्रचंड खोल असतं. कुठे याच शांत पाण्याखालचे भोवरे अशा वेगाने खाली खेचतात की परत नखही दृष्टीला पडू नये. या दिवसांत समुद्रही मित्र राहत नाही, अनोळखी होऊन जातो. जीवदायिनी नदी जीवघेणी होते. कितीही पट्टीचे पोहणारे असाल तरी अशावेळी फालतू आत्मविश्वास न ठेवलेलाच बरा. ज्या ठिकाणाविषयी काहीही माहिती नाही अशा ठिकाणी जीवघेणं साहस करायलाच पाहिजे का? पुष्कळदा किनाऱ्यांवर ते ठिकाण पोहण्यासाठी किती धोकादायक आहे. गेल्या काही वर्षांत किती लोकांनी प्राण गमावले, याची आकडेवारी लिहिलेला बोर्ड असतो, पण त्याच्याकडेही सोयीस्कर दुर्लक्ष करतो आपण. बरं आपण निवडलेली ठिकाणंही इतकी आतल्या भागात असतात की आराडाओरडा करूनही मदत मिळण्याची शक्यता नसते. मिळाली तरी पुष्कळदा मृतदेह वर काढण्याच्या वेळी ती पोहचते.

आणखी एक गोष्ट. ट्रीप प्लॅन करताना ड्रिंक्सचा क्रेट कुणी आणायचा हे पण ठरतं का तुमच्यात? एंजॉय करण्याच्या व्याख्येत हे असू नये असं म्हणून तुमचा मूड खराब करणार नाही. पण दारू पिणं ही चार भिंतींच्या आत बसून करायची गोष्ट आहे असं नाही वाटत तुम्हाला? मस्त पाऊस पडतोय. सोबत जीवलग दोस्तमंडळी आहेत. निसर्ग त्याचं वैभव तुमच्यासमोर खुलं करून बसलाय. ही नशा पुरेशी नाहीये? पावसाळी सहलीसाठी आपल्यासारखीच कुटुंबही बाहेर पडतात. आपण आरडा ओरडा करत नशेत अचकटविचकट बोलत असतो, तेव्हा बायका, लहान मुलं, वयस्क माणसं यांनी तिथं मिनिटभरही थांबू नये असा माहौल असतो. कमरेला नावापुरतं वस्त्रं. हातात बाटली नाहीतर कॅन, अचकट विचकट अंगविक्षेप, अर्वाच्य भाषा हेच तरुणाईचं इंप्रेशन व्हावं असं वाटतं तुम्हाला? खूपदा किल्ल्यांवर जातो आपण पाऊस एंजॉय करायला. इतिहास घडवायला आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं असतं तिथं बाटलीतून हिंदकळणारी दारू सांडायची? 'हर हर महादेव'च्या गर्जना झाल्या तिथं चिअर्सचा घोष करायचा?... जस्ट थिंक फ्रेंड्स. अशा तरंगत्या अवस्थेतच अपघातांची शक्यता कैक पटीने वाढते. तासाभराची कैफ आयुष्यातून उठवू शकतो. तेव्हा भान विसरून एंजॉय करू या पण बेभान नाही व्हायचं हेही ठरवू या.

आयुष्य इतकं स्वस्त नसतं दोस्त! अशा सहलीतच नव्हे तर नेहमीच हे डोक्यात असायला हवं. लोकलच्या गर्दीत एका हाताने लोंबकळताना, हेल्मेट शिवाय सुसाट बाइक हाकताना, एक्स्प्रेस वेवरून जाताना स्पीडोमीटरच्या काट्याला थकवताना...नेहमीच. आई वडिलांचा जीव असतो तुमच्यात. कुणीतरी जन्मोजन्मीची गाठ मारून आयुष्य जोडलेलं असतं तुमच्याशी. मित्रांच्या हृदयात जागा असते तुमची, डोळे तुमच्या वाटेवर अंथरून 'पपा काय आणलं', म्हणत चिमुकले हात पसरून कुणीतरी वाट बघत असतं तुमची. तुम्ही पाहिलेलं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न अर्ध्या वाटेवर तुमच्या प्रतीक्षेत असतं... सो बी केअरफुल.

नाऊ प्लान आऊट द थिंग अँड एन्जॉय . मग कुठे जाताय या वीकेण्डला? कळवा.

हॅव अ हॅपी अॅण्ड सेफ मॉन्सून पिकनिक. टेक केअर दोस्त!
 
2010Dahanu's Mahalaxmi. To Promote tribal unity in Thane | Powered by AYUSH
Design and Concept by AYUSH | Dahanu Darshan By Adivasi | Distributed by AYUSHonline